मी मोठं होऊन डॉक्टर होणार… मी इंजिनिअर झाल्यावर मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणार… मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे… मला ना हायफाय जॉब करायचाय… या इच्छा आकांक्षा आपण रोज कुठे ना कुठेतरी ऐकतच आहोत. कुठे कशाला, आपल्याच घरातसुद्धा !
पण, “मला ना, भारी शेतकरी व्हायचंय”, असं किती टक्के विद्यार्थी ठामपणे म्हणतात? म्हणणार तरी कसे ते, जसं डॉक्टर बाप आपल्या लेकीला व्यवस्थित समजावतो की ‘बघ, डॉक्टर झालीस ना, तुला लोकांची सेवा करता येईल.’ इंजिनिअर आई आपल्या मुलाला सांगते, ‘बाळा, तू इंजिनिअर झालास ना, तुला दैनंदिन जीवनातील, व्यवसायातील बऱ्याच अडचणी सोडवणारं यंत्र बनवता येईल.’ आता आपल्यापैकी बोटांवर मोजण्याइतके क्वचितच शेतकरी आईवडील आपल्या लेकाला व लेकीला शेतीसारख्या पुण्य कामाचे महत्व समजावताना दिसतात. त्यात शेजारच्या मुलाला शहरात नोकरी मिळाली, की मग तर झालच. आता शेतीत काही उरलच नाही; हे घोषित करायला आपण मोकळे. अशाने त्यांच्यात शेतीबद्दल आत्मीयता निर्माणच कशी होणार ? मग हीच मुलं शहरात एकाच्या उरावर दुसरं, अशी 4 पाहुणे आले तरी न पुरणाऱ्या घरात राहणार आणि इकडे आपल्या जमिनी मात्र ओसाड…
हे चित्रपण बदलू शकतं बरकां ! जर आपल्या लेकानं आणि लेकीनं कृषी पदवीचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं, कृषी इंजिनिअरिंग केलं, बायो टेक्नॉलॉजि केलं, प्राणिशास्त्र-वनस्पतिशास्त्रावर अभ्यास केला, पशुवैद्यकीय शिक्षण घेतलं, मत्स्य शास्त्र शिकलं, फ्लोरीकल्चर, फलोत्पादन, फूड सायन्स, न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स किंवा इतर इंजिनिअरिंग करूनदेखील त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या बापाने कमावलेल्या शेतीचा उद्धार करायला केला, तर शेतकऱ्याचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरायला काहीच वेळ लागणार नाही.
गरज आहे ती फक्त एका सकारात्मक दृष्टिकोनाची आणि आपल्या शेतीची महत्ता आजच्या पिढीला समजावून व उमजावून देण्याची.
– शितल स्वामी
Very nice ??
Well written and really Inspiring !!
I really got goosebumps while reading this bolg.,
Nicely explained …
Keep Growing!!